माणूसकी हाच खरा शाश्वत धर्म   

डॉ. दिलीप पटवर्धन यांचे प्रतिपादन 

पुणे : आपण सर्व जण समान आहोत. सर्वांना समान अधिकार आहेत. जात, धर्म आणि प्रांताचा विचार न करता सर्वांनी माणूस म्हणून जगले पाहिजे. एकी ही काळाची गरज असून माणूसकी हाच खरा धर्म आहे. त्यामुळे एकमेकांना समजून घेणे हीच खरी जीवन मूल्ये आहेत. असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ व जीवन विद्या मिशनचे कार्यकर्ते डॉ. दिलीप पटवर्धन यांनी रविवारी केले.  
 
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ज्ञानसत्रात ‘मानवी मूल्ये’ या विषयावर डॉ. दिलीप पटवर्धन बोलत होते. भारतीय लोक वेगवेगळ्या मुद्यांवर कायमच विभागले जातात. त्यातूनच मानवी मूल्यांची घसरण होते. सांस्कृतिक एकता हे त्यावरचा उत्तम पर्याय आहे. इथे कोणीही मोठा आणि छोटा नाही. ज्यांना जे मिळते ते त्यांच्या कर्तृत्त्वावर मिळते. अज्ञानी लोकांत अहंकार अधिक असतो. त्यांच्यातला अहंकार कमी झाला पाहिजे, असेही डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. 
 
डॉ. पटवर्धन म्हणाले, जीवन मूल्य निसर्ग नियम पाळतात. निसर्ग नियम हे वैश्वीक असतात. त्यामुळे जीवन मूल्ये बदलत नाहीत. नितीनियम कायम बदलत असतात. सत्य, प्रेम, निष्ठा आणि शांतता या गोष्टींचे मानवाने पालन केले पाहिजे. आनंद विकत घेता येत नसला, तरी या गोष्टींतून आनंद मिळविता येतो. समता, कर्तव्य, कृतज्ञता या गोेटींना खुप महत्त्व आहे. धर्म हा निसर्ग नियमांवर अधारित असला पाहिजे. कर्तव्य धर्म सर्वांत उत्तम आणि मानव हिताचा आहे. विश्व धर्म आपण पाळत नाही. त्यामुळे अनेक परिणामांना आपणास सामोरे जावे लागत आहे. ज्ञानदानाने ज्ञान वाढते. त्यामुळे ज्ञान घ्या आणि ज्ञान द्या ही संस्कृती उदयाला आली पाहिजे. 
 
आपल्यावर राज्य करण्यासाठी ब्रिटिशांनी येथील लोकांत मनभेद केला. ब्रिटिशांच्या कुटनितीला आपण बळी पडलो. छत्रपतींचे राज्य हे खर्‍या अर्थाने रयतेचे राज्य होते. त्यात स्त्री सन्मान होता. आपल्याकडे विद्यापीठांची परंपरा प्राचीन आहे. त्यामुळे मुळातच आपण ज्ञानी आहोत. आपल्याकडे अस्तित्त्वात असलेल्या प्रत्येक भाषेत ज्ञानाचे भांडार आहे. त्या ज्ञानाचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आपल्या परंपरागत ज्ञानाच्या जोरावर आपण जगाचे नेतृत्त्व करू शकू असा विश्वासही डॉ. दिलीप पटवर्धन यांनी व्यक्त केला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ ट्रस्टचे सचिव अजित खाडीलकर यांनी डॉ. दिलीप पटवर्धन यांचा सत्कार केला. सुत्रसंचालन संजय ऐलवाड यांनी केले. 

Related Articles